नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातुन कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची अनेक वर्षापासून नंदुरबार ते मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी होती.अखेर ही मागणी पूर्ण झाली असून नंदुरबार ते मुंबई सेंट्रल सुरू झाली असून, खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक मुंबई येथे नोकरीनिमित्त व कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार ते मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून आजपासून नंदुरबार ते मुंबई सेंट्रल सुरू झाली आहे. नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून प्रवाशांना घेऊन नंदुरबारहुन रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. गाडी क्रमांक १९४२५ रोज नंदुरबारहुन दुपारी २ वाजता मुंबईला रवाना होवून रात्री १२.५० वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. तर मुंबई सेंट्रलहुन १९४२६ गाडी क्रमांक रात्री १०.३० वाजता नंदुरबारकडे रवाना होणार आहे. सकाळी ९.५० वाजता ही गाडी नंदुरबारला पोहचेल. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी रेल्वे प्रवासाची चांगली सोय झाली असून पहिल्याच दिवशी ३८० पैकी २४८ सीट बुकिंग झाले आहे. सदर रेल्वे गाडी गुजरातमार्गे सुरतला न जाता बेस्तानमार्गे पश्चिम रेल्वेने थेट मुंबईला पोहोचणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांच्या मागणीचे खासदार डॉक. हिना गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहे.