औरंगाबाद- देशातील सर्वात मोठं मातीची धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाचे आज सायंकाळी 18 दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडण्यात आलेे. जायकवाडी धरण जुलै महिन्यातच 90 टक्के भरल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दरम्यान, गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्यातच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने वरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे या धरणांमधून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर पाण्याची आवक मोठ्याप्रमाणावर झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळाले. जायकवाडी धरणात 90 टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सद्या धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.