जुन्नर – जुन्नर तालुक्यात काल विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळतालुक्यातील आणे गुळुंचवाडी येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडली. यामध्ये तब्बल १२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय एक महिलाही गंभीर जखमी झाली.
धोंडिबा कोतवाल आणि त्यांची पत्नी कमल कोतवाल हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. आणे शिवारात ते शेळ्या चारत असताना अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली, शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, त्या झाडावर अचानक वीज कोसळली, यामध्ये १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना सुद्धा विजेच्या झटका लागला. यामध्ये कमल सुद्धा जखमी झाल्या आहेत. कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी केली आहे.