मुंबई – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या बुधवारी, २० तारखेला होणार होती. मात्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ती आता ३१ जुलैला घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सुरुवातीला शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ला घेण्यात येणार होती. मात्र परिक्षेसाठी नोंदणी करून तीन ते चार उलटूनही ती होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा नक्की कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर परीक्षा परिषदेतर्फे नवीन तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार २० जुलैला राज्यभरातील ५,७०७ परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलैला होणार असून २० जुलैच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच या परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाईल. दरम्यान, राज्यात यंदा इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी ४ लाख १७ हजार ८९४ आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ३ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.