पुणे : पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.मंगळवार २६ जुलै रोजी सकाळपर्यंत धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २१.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) ७२.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.दरम्यान, खडकवासला धरणातून तूर्त पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २१.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात सहा मि.मी, पानशेत धरण परिसरात पाच मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघा दोन मि.मी. पाऊस पडला. सोमवारी रात्री चारही धरणांत २१.०३ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी ०.१२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.