मुंबई – वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील 2250 सेवानिवृत्त पोलीस आणि पोलिसांना बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 50 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपयांमध्ये घर देण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरवरून दिली.
यापूर्वी तिन्ही चाळींमध्ये पोलिसांनाही पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हक्काचे घर देण्यात यावे, अशी मागणी होत होती. मात्र बीडीडी चाळीतील सेवानिवासस्थानांमध्ये पोलीस वास्तव्यास असल्याने त्यांना कायमस्वरूपी मोफत घरे देता येणार नाहीत असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र सरकारने त्यासाठी विशेष तरतूद करून अखेर पोलिसांची मागणी मान्य केली. सरकारकडून 50 लाखांत पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या किमतीला पोलिसांनी आणि त्यांच्या संघटनांनी विरोध केला. या विरोधानंतर सरकारने 50 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा आव्हाड यांनी आज ट्विटरवरून केली.