मुंबई : सध्या मंदिर आणि मशीदीवर दावे-प्रतिदावे होत असताना, ज्ञानवापी प्रकरण न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची,गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे. यावर मोहन भागवतांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मी मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मोहन भागवत यांनी ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,’ अशी विचारणा नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करत, म्हणाले की, “या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घऱात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही”. काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.“काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. ते म्हणाले गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.