मुंबई – जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या चार दिवसांतील दमदार पावसामुळे ४७ दिवसांचा पाणीसाठा वाढला.
मुंबईला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या ७ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. या ७ तलावांमध्ये ३ लाख ७५ हजार ५१४ एमएलडी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. रोज मुंबईला ३८५० एमएलडी पाणी पुरवठा होतो. मुंबईतील १० टक्के पाणीकपात लवकर बंद होणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तलाव क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने गेल्या केवळ चार दिवसांत १ लाख ८२ हजार एमएलडी पाणी वाढले, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावांमध्ये अधिक पाणीसाठा आहे.