नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून १२ ऑगस्ट रोजी त्याची सांगता होणार आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी जीएसटी आणि महागाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना शपथ देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. तसेच जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांना श्रद्धांजली वाहिली. तर, राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. नायडू म्हणाले, ‘त्यांच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळाले. हे अधिवेशन सार्थक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.’ दरम्यान, राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरातच काँग्रेसचे अनेक सदस्य अध्यक्षांच्या आसनाजवळ आले आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले. महागाईसह विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला जाब विचारला. त्यावर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सदस्यांना मतदान करता यावे, यासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याची घोषणा व्यंकय्या नायडू यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. तर दुसरीकडे राष्ट्रपती निवडणुकीत सदस्यांना मतदान करता यावे, यासाठी लोकसभेचे कामकाजदेखील दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मात्र त्यानंतर महागाईवर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे हे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले. आता उद्या सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू होईल. दरम्यान, राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज पार पडली.