मुंबई – मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात राऊत यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात राऊत यांना आज ‘ईडी’ने मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी राऊतांनी ७ ऑगस्टपर्यंतचा वेळ मागितला आहे.
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती.
दरम्यान, मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. राऊतांची दोन वेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर आता त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंतचा वेळ मिळणार का, याकडे लक्ष असेल.