नवी दिल्ली – भारतात कोरोनाचा वेग कमी झालेला असला तरीही अनेक देशांत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राज्यातील कोरोनाप्रतिबंधक सुरक्षा कमी करू नका, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
अनेक आशियाई देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीनमध्ये अनेक शहरांत कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. तर, युरोपिय देशांतही कोरोनाचा संसर्ग वाढ आहेत. त्यामुळे राज्यांनी कोणत्याही स्थितीत नियमांचं पालन करावं अशा सूचना केंद्राने केल्या आहेत. तसेच, आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्याकडेही लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल असं सांगितलं आहे. तसंच लोकांनी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले आहे.
Union Health Secretary Rajesh Bhushan writes to all Addl Chief Secys, Principal Secys, Secys (Health) of all States/UTs, emphasizing that there should be a continued focus on the five-fold strategy, i.e., Test-Track-Treat-Vaccination and adherence to COVID Appropriate Behavior. pic.twitter.com/XIqkvXR1fF
— ANI (@ANI) March 18, 2022
सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियटंचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची माहिती व्हावी याकरता राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी जास्तीत जास्त नमुने INSACOG कडे पाठवावेत असं आवाहन राजेश भूषण यांनी केलं आहे. कारण, नव्या व्हेरियंटची माहिती मिळाली तर त्याचा प्रसार रोखता येईल.
कोरोना प्रतिबंधक नियमांची जनजागृती करण्याची गरज असून मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता पाळण्याची आठवण करून दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे आहे असंही सांगण्यात आले आहे.